गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३६ व्या घटक राज्य दिनाच्या शुभ प्रसंगी गोव्यातील लोकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणतात, १९६७ मध्ये ओपिनियन पोलने घटक राज्य प्रवासास सुरुवात झाली ज्याने गोवा हे वेगळे राज्य म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. ३० मे – हा गोव्याच्या गौरवशाली राजकीय इतिहासातील एक संस्मरणीय दिवस आहे, याच दिनी १९८७ मध्ये गोवा हे भारतीय संघराज्याचे २५ वे राज्य बनले होते. हा दिवस गोमंतकीयांनी आपली ओळख जपण्यासाठी केलेल्या संघर्षाचा परिणाम आहे.”
मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणतात, गोवा ही निसर्गसौंदर्य आणि उबदार मनाच्या लोकांची भूमी आहे राज्य अनेक क्षेत्रात भारताच्या विकासाचा मार्ग समृद्ध करीत आहे. राज्य संधींनी परिपूर्ण आहे आणि त्याची सर्व दिशांनी भरभराट होत आहे. लोकांचे समर्पण आणि योगदान यामुळेच गोव्याला राज्य सरकारद्वारे सुरू केलेले आणि राबविण्यात येत असलेले विविध विकासात्मक प्रकल्प आणि कार्यक्रम साध्य करणे शक्य झाले आहे.
“या ऐतिहासिक प्रसंगी, राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्यांनी योगदान दिले त्या सर्व नेते, विचारवंत आणि गोव्यातील जनतेचे आपण स्मरण करूया आणि नतमस्तक होऊया. गोव्याला ‘स्वयंपूर्ण’ बनविण्याचा आणि सर्व क्षेत्रात स्वावलंबी पद्धतीने प्रगती आणि विकास साधण्याचा आपण संकल्प करूया असे मुख्यमंत्री आपल्या संदेशात शेवटी म्हणतात.