गोवा खबर : “पाताल-टी’ हा चित्रपट, मानव-निसर्ग यांच्यातील संघर्षाची कथा असून, पर्यावरणावर मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारा तणाव निसर्गाचा कसा ऱ्हास करतो आहे, हे सांगणारा आहे.” अशी माहिती, पाताल-टी चे निर्माते-दिग्दर्शक मुकुंद नारायण यांनी दिली. गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीच्या आजच्या आठव्या दिवशी झालेल्या ‘टेबल टॉक्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. ह्या चित्रपटात, लोककथांच्या समृद्ध परंपरेचा उत्तम वापर करण्यात आला आहे. भारतात कित्येक पिढ्यांपासून, लोककथांचा हा वारसा मौखिकरित्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवला जात असून प्रत्येक लहान मुलासाठी ही कथा नवी असते, असेही ते म्हणाले.
पाताल टी चित्रपट भूतिया या आदिवासी बोलीभाषेतील असून, समाजातील विविध बदलांमुळे या स्थानिक बोली भाषा आज नामशेष होण्याच्या धोकादायक उंबरठ्यावर उभ्या असल्याबद्दल देखील हा चित्रपट भाष्य करतो, असेही त्यांनी सांगितले.
या चित्रपटाविषयी अधिक माहिती देतांना, चित्रपटाचे सहदिग्दर्शक संतोष सिंह यांनी सांगितले की, हा चित्रपट भूतिया आदिवासी समुदायाविषयी आहे. “आम्ही यात पाणी हे रुपक म्हणून वापरत, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.” असं दिग्दर्शकांनी सांगितलं. पिढ्यानपिढ्या, मौखिक रित्या चालत आलेल्या लोककथांममधून चित्रपटातील मुख्य कलाकार असलेल्या मुलाला, जीवन- मृत्यू आणि शुद्ध पवित्र पाण्याचा शोध घेत असतांना, इतर विषयांवरील दृष्टिकोन मिळतो.
“आमच्यासारख्या स्वतंत्र निर्मात्यांसाठी चित्रपट बनवण्यासाठीचे पैसे गोळा करणे कठीण काम असते, मात्र तरीही,आम्हाला पाताल-टी ची कथा सगळ्यांना सांगायाची होती, म्हणून आम्ही या चित्रपट काढला. चित्रपट निर्मितीनंतर, रसूल पुक्कुटी यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी आम्हाला मदत केली. त्या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत.”, असेही मुकुंद नारायण यांनी संगितले.
भारतातील प्रादेशिक चित्रपटांच्या भवितव्याविषयी बोलतांना संतोष सिंह यांनी हे ही सांगितले की, आपण आता नव्या जगात पोहोचलो आहोत, जिथे ‘प्रादेशिक सिनेमा’ आता ‘नवा वैश्विक सिनेमा’ ठरला आहे. आज भारतातील प्रादेशिक चित्रपट जग जिंकत आहेत. मग तो कांतारा असो, की वागरो असो किंवा फ्रेम असो,” असेही सहदिग्दर्शक म्हणाले.