तूर डाळ आणि साखरेची नासाडी केल्याबद्दल भाजप सरकारला कष्टकरी महिलांचा शाप लागेल:महिला काँग्रेस
गोवा खबर: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत बेजबाबदार भाजप सरकारने जवळपास ३.५ कोटी किंमतीची सुमारे २५० मेट्रिक टन तूर डाळ आणि १०.३ मेट्रिक टन साखरेची नासाडी केली, ही धक्कादायक बाब आहे. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांकडुन भाजप सरकारला ‘शाप’ लागेल, असा घणाघात गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी केला आहे.
या गंभीर प्रकारास जबाबदार असलेले मंत्री आणि अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची आमची मागणी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने कारवाई करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, असे बीना नाईक यांनी नमूद केले.
तूर डाळीचे भाव जवळपास २०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने लोक खरेदीसाठी धडपडत असताना बेफिकीर भाजप सरकारने तूर डाळ गोदामात सडू दिली हे अत्यंत दुर्दैवी आहे. आजही तूरडाळीचा बाजारभाव १०० रुपये किलोच्या वर आहे, असे बीना नाईक यांनी म्हटले आहे.
सरकारी गोदामातील साखर वितळल्याच्या वृत्ताने भाजपची असंवेदनशीलता परत एकदा उघड झाली आहे. कोट्यवधी भारतीयांचे पोट भरण्यासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाची सरकारला किंमत नसल्याचे यावरून दिसून येते, असे बीना नाईक म्हणाल्या.
प्रधानमंत्री मोदींच्या क्रोनी क्लबमधील खाजगी कंपन्यांना डाळ-साखर सारख्या वस्तू आयात करून माया कमावण्यासाठी जाणूनबुजून अन्नपदार्थ खराब होऊ दिले जातात. मोदी सरकार आपल्या क्रोनी क्लबची तिजोरी भरण्यासाठी जनतेचा पैसा वापरत आहे अशी टिका बीना नाईक यांनी केली.
कोविडमुळे देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान केपें येथील एका गोडाऊनमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या बेकायदेशीर साठ्याची मला गोव्यातील लोकांना आठवण करून द्यायची आहे. लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी धडपडत होते आणि भाजपचे उपमुख्यमंत्री विविध वस्तूंचा साठा करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता, असे बीना नाईक यांनी लक्षात आणुन दिले आहे.