गोवा खबर

माननीय मुख्यमंत्री! भाजपच्या राजकीय फायद्यासाठी प्रतीकात्मकता बस्स झाली, आता कृती करुन दाखवा : अमित पाटकर

Published

on

Spread the love
 गोवा खबर: भाजपला भगव्यापेक्षा तिरंग्याचे महत्त्व अखेर कळले आहे, हे पाहून आनंद वाटतो. भाजपला उशीरा शहाणपण आले हे बरे झाले. राजकीय संधीसाधूपणासाठी प्रतिकात्मक उत्सव व कार्यक्रम आता बस्स झाले. सामान्य माणुस, उपेक्षित आणि तरुणांना आर्थिक ओझ्यातुन आणि असुरक्षिततेपासून मुक्त करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडिया हँडलवरील डिस्प्ले पिक्चर बदलून घरोघरी राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन गोवावासीयांना केल्यावर प्रतिक्रिया देताना महात्मा गांधी-पंडित नेहरू-सरदार पटेल यांना पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांमध्ये आलेल्या या बदलाने नक्कीच आनंद झाला असेल, भगवा हा राष्ट्रध्वज बनवण्याची स्वप्ने पाहत मुर्खांच्या नंदनवनात राहणार्‍या भाजप भक्तांमध्ये झालेले परिवर्तन स्वागतार्ह आहे असा टोला अमित पाटकर यांनी हाणला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमच्या तिरंग्याच्या प्रतिकात्मक अर्थाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. भगव्या रंगाचे महत्त्व म्हणजे त्याग व निस्वार्थीपणा. भाजप नेत्यांनी भौतिक लाभ घेण्यापासुन दूर राहून लोक कल्याणकारी  कामात स्वत:ला झोकून दिले पाहिजे, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.
आपल्या राष्ट्रध्वजात मध्यभागी पांढरा रंग आहे. आपले आचरण सत्यावर आधारितच असावे असा बोध  हा शुभ्र रंग दाखवतो. आज भाजप सरकार तथ्ये आणि आकडेवारी लपवून सर्वकाही अंधारात ठेवू इच्छित आहे.
हिरवा रंग आमचे मातीशी असलेले नाते, इथल्या वनस्पती जीवनाशी असलेला संबंध दाखवतो, ज्यावर इतर सर्व जीवन अवलंबून आहे. मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांनाही  या रंगाच्या प्रतिकात्मक अर्थावर आत्मपरीक्षण करण्याची मागणी करतो. गोवा क्रोनी क्लबकडे सोपवण्याचे व निसर्गसंपन्न भूमिचे पर्यावरण नष्ट करण्याचे भाजपचे कृत्य आमच्या राष्ट्रध्वजातील हिरव्या रंगाच्या प्रतिकात्मकतेशी किती विसंगत आहे याचे भान त्यांनी ठेवावे, असे अमित पाटकर म्हणाले.
पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले “अशोक चक्र” आपणाला सत्याच्या मार्गाने व सद्गुण अंगी बाळगण्याचा संदेश देते. भाजपने या पैलूवरही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण त्यांची राजवट जुमलेबाजी व खोटारडेपणाने भरलेली आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
अखंडीत वीज पुरवठा, शुद्ध पाण्याचा नियमित पुरवठा, समाजकल्याण योजनांच्या लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक सहाय्य, युवकांना रोजगार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, खड्डेमुक्त रस्ते, अखंड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विवेकपूर्ण वित्तीय व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. भाजपच्या राजकीय फायद्यासाठी प्रतीकात्मक कार्यक्रम करुन आधीच दिवाळखोर झालेले गोवा  राज्य आणखी खोल संकटात गाडले जाईल, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला.

Trending

Exit mobile version