गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. भारताची एकता, प्रतिष्ठा आणि प्रगती यासाठी आपले जीवन समर्पित करणारे एक महान राष्ट्रनिर्माते, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि दूरदर्शी नेते म्हणून पंतप्रधानांनी डॉ. मुखर्जी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
शिक्षण, औद्योगिक विकास आणि राष्ट्रीय एकात्मता या क्षेत्रांमध्ये डॉ. मुखर्जी यांनी दिलेले अमूल्य योगदान पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. ‘विकसित भारत’च्या ध्येयाकडे वाटचाल करताना डॉ. मुखर्जींची दूरदृष्टी आणि त्यांचे आदर्श भारतासाठी कायम मार्गदर्शक राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या संदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट करत डॉ. मुखर्जी यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. मुखर्जी यांचे जीवन विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवेविषयी अतूट समर्पणाने प्रेरित होते. त्यांनी शिक्षणतज्ज्ञ म्हणून भविष्यवेधी शिक्षणाला प्रोत्साहन दिले, तर उद्योगमंत्री म्हणून देशाच्या औद्योगिक स्वावलंबनाचा पाया रचला. बंगालच्या दुष्काळादरम्यान त्यांनी केलेले मानवतावादी कार्य त्यांच्यातील अपार करुणा दर्शवते. भारताची एकता आणि अखंडता याबाबत डॉ. मुखर्जी यांची दृढ निष्ठा देशवासीयांसाठी सदैव प्रेरणेचा स्रोत राहील, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.