गोवा खबर : राज्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि पुलांच्या सुरक्षेबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी प्रशासनाला कडक शब्दांत ताकीद दिली आहे. मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि खड्डे भरणे ही आपली पहिली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करत त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सांगितले.
अलीकडेच एका पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला असून त्यावरील गंभीर स्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. जलवाहिन्या आणि भूमिगत केबलिंगसाठी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांना गती देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. वेस्टर्न बायपास आणि नुवे उड्डाणपूल परिसरातील पथदिव्यांची दुरुस्तीही सुरू असून कामे जलदगतीने पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा कामत यांनी दिला आहे.