गोवा खबर : राजधानी दिल्लीत रविवारी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे एअर इंडियाच्या तीन विमानांचे नुकसान झाले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावरील टर्मिनल-२ येथे उभी असलेली ही विमाने वादळाच्या तडाख्यात सापडली.
घटनेनंतर संबंधित तीनही विमाने तात्काळ सेवेतून काढून घेण्यात आली असून त्यांच्या तांत्रिक तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. विमानांच्या नुकसानीचे नेमके कारण आणि प्रमाण तपासले जात आहे.
दरम्यान, खराब हवामानामुळे विमान वाहतुकीवरही परिणाम झाला. अनेक उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल करावे लागले, तर काही उड्डाणांना विलंब झाला. त्यामुळे विमानतळावर प्रवाशांची गैरसोय झाली.
दिल्लीत रविवारी संध्याकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. याचा फटका विमान वाहतुकीलाही बसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.