गोवा खबर

जंगलातील पायवाटा आणि धबधब्यांपर्यंत पसरत आहे कचरा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्याची ओळख नेहमीच त्याच्या निसर्गरम्य प्रदेशांशी जोडलेली आहे. समुद्रकिनारे, जंगले, खारफुटीचे भाग आणि धबधबे हे केवळ पर्यावरणीय संपत्ती नाहीत, तर पर्यटन आणि स्थानिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. परंतु आता या ठिकाणी एक नवी समस्या अधिक दिसू लागली आहे.

आता कचरा फक्त शहरांमध्ये किंवा रस्त्यावरील कचरापेट्यांभोवती मर्यादित राहिलेला नाही. तो ट्रेकिंग मार्गांवर, धबधब्यांच्या परिसरात, खारफुटीच्या जंगलात आणि किनारपट्टीवरही वाढत्या प्रमाणात दिसत आहे. पर्यटकांनी किंवा वसाहतींमध्ये टाकलेला कचरा वारा, पावसाचे पाणी आणि मानवी हालचालींमुळे दूरवरच्या नाजूक परिसंस्थांमध्ये पोहोचतो.

या भागात नियमितपणे जाणाऱ्या लोकांच्या मते हा बदल स्पष्टपणे जाणवतो. ईको ट्रॅक्स गोवाच्या आरती दास, ज्या वारंवार जंगलातील ट्रेक्सचे नेतृत्व करतात, त्यांचे म्हणणे आहे की अनेक ट्रेकिंग मार्गांवर आता कचरा दिसतो.

त्या म्हणतात, “ट्रेकिंग करताना आम्ही अनेकदा मार्गावर पडलेला कचरा परत आणतो. आम्ही ट्रेकर्सना स्वतःचे कप आणि प्लेट्स आणण्यास सांगतो, जे फेकून देण्यासारखे नसतात. त्यामुळे कचरा कमी होतो आणि पर्यावरणपूरक ट्रेकिंगची सवयही लागते.”

काही गट पर्यटकांनी टाकलेला कचरा साफ करण्यासाठी क्लीन-अप ट्रेक्स देखील आयोजित करतात. मात्र दास म्हणतात की हे प्रयत्न मर्यादित असतात. “नेहमीच कचरा गोळा करणे शक्य नाही. खरे तर जागरूकता वाढणे गरजेचे आहे. ट्रेकर्स आणि पर्यटकांनी स्वतःच्या बाटल्या, प्लेट्स आणि कप वापरावेत आणि डिस्पोजेबल वस्तू टाळाव्यात.”

वन्यजीव बचावकर्त्यांच्या मते कचरा प्राण्यांसाठी गंभीर धोका ठरू शकतो. सेव्ह गोवा चे श्रीचरण देसाई, जे जंगल भागात बचाव मोहिमा करतात, म्हणतात की प्राणी अनेकदा टाकलेल्या कचऱ्यात अडकतात किंवा जखमी होतात.

ते म्हणाले, “जंगल भागात निष्काळजीपणे टाकलेल्या कचऱ्यामुळे साप आणि इतर प्राण्यांना जखमा होत असल्याची अनेक प्रकरणे आम्हाला दिसतात. काही वेळा सापांचे तोंड बिअरच्या कॅनमध्ये अडकते, कुत्र्यांचे डोके प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये अडकते आणि घोरपडसुद्धा प्लास्टिक कंटेनरमध्ये अडकलेली आढळतात.”

काही वेळा प्राणी कचऱ्याला अन्न समजतात. देसाई यांच्या मते अन्नाचा कचरा उंदरांना आकर्षित करतो आणि त्यांच्या वासामुळे साप प्लास्टिक किंवा धातूच्या वस्तू गिळतात.

पर्यटनामुळे या भागांवर दबाव वाढला आहे. गोव्यात दरवर्षी एक कोटीहून अधिक पर्यटक येतात, जे राज्याच्या लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे. बाटलीबंद पेये, स्नॅक्स पॅकेट्स यांसारख्या पॅकेजिंग वस्तूंचा वापर वाढल्याने सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे प्रमाणही वाढते.

पर्यावरण अभ्यासकांच्या मते लोकांच्या वर्तनात बदल घडवण्यासाठी कचऱ्यालाच मूल्य देणे आवश्यक आहे. जेव्हा कचरा परत देउन मोबदला मिळणारे साहित्य बनतो, तेव्हा तो जंगलात, ट्रेकिंग मार्गांवर किंवा धबधब्यांच्या परिसरात टाकण्याची शक्यता कमी होते.

ऑफ ट्रेल एडवॅन्चर्स च्या संस्थापक बियांका डायस यांच्या मते समस्या फक्त कचऱ्याची नाही, तर निसर्गरम्य ठिकाणी वाढणाऱ्या गर्दीचीही आहे.

त्या म्हणतात, “माझ्या मते फक्त कचरा नाही, तर या सुंदर ठिकाणी जबाबदारी न बाळगता येणारी गर्दीही मोठी समस्या आहे. माझ्यासाठी जंगल हे उपासनेचे ठिकाण आहे आणि धबधबे म्हणजे ध्यान करण्याची जागा आहेत.”

Trending

Exit mobile version