गोवा खबर : विकसित भारत युवा नेते संवाद 2026 च्या आरंभपूर्व कार्यक्रमांचा भाग म्हणून, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भारत मंडपम इथे आयोजित केंद्रीय मंत्र्यांच्या एका गटासमोर झालेल्या सादरीकरणांदरम्यान तरुण नेत्यांशी संवाद साधला. देशभरातील उत्कृष्ट युवा प्रतिनिधी आणि वरिष्ठ धोरणकर्ते यांच्यात थेट व रचनात्मक संवादासाठी हा एक प्रभावी मंच उपलब्ध झाला, त्यामुळे हे सत्र संवादातील एक महत्त्वाचा टप्पा ठरले.
या सत्रात युवा नेत्यांनी शाश्वत आणि हरित विकसित भारताची उभारणी, स्मार्ट आणि शाश्वत शेतीद्वारे उत्पादकतेत वाढ, परंपरा आणि नवकल्पनेतून आधुनिक भारताची उभारणी अशा विविध विषयांवर आपले विचार, धोरणात्मक दृष्टीकोन आणि विविध संकल्पनांवर आधारित वास्तव स्तरावर नवोन्मेषाची मांडणी केली. या सादरीकरणांमधून भारतीय युवांची वैचारिक विविधता, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता दिसून आली; ही समावेशक आणि शाश्वत विकासाच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
सहभागींना संबोधित करताना शिवराज सिंह चौहान यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी उद्देशपूर्ण जीवन आणि सामूहिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या सांस्कृतिक व सभ्य परंपरेचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की समाज व राष्ट्राच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केल्यावरच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. वचनबद्ध राहून आणि शिस्त पाळून मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी तरुण नेत्यांना प्रेरित केले. तसेच, समर्पण, एकाग्रता व अंतर्गत सामर्थ्य हे नेतृत्वासाठी आवश्यक गुण असल्याचे नमूद केले. तसेच, विकसित भारताच्या दिशेने प्रवासात अर्थपूर्ण युवा सहभाग सक्षम करणारे मंच निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शनाचा त्यांनी उल्लेख केला.
विकसित भारत युवा नेते संवाद 2026 चे आयोजन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे माय भारत मंचाच्या माध्यमातून करण्यात येत असून, प्रशासन व धोरणात्मक चर्चांमध्ये युवा सहभाग संस्थात्मक करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.