म्हापसा येथील कार्यक्रमात गुरुपूजन करताना अधिवक्ता सुशांत आणि अधिवक्ता सुलक्षा देऊसकर, तर बाजूला पौरोहित्य करताना राजू केळकर.
Spread the love
गोवा खबर : धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणार्यांची संख्या आणि शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे; कारण भगवंत आणि गुरुतत्त्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्यांवरच असतो. आजही गुरुतत्त्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले.
चेतन राजहंस
ते ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्ये’ या विषयावर १० जुलै रोजी संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रसंगी मार्गदर्शन करत होते. यंदा गुरुपौर्णिमा महोत्सव देशभरातील ७७ ठिकाणी आणि गोव्यात म्हापसा, पर्वरी, फोंडा, साखळी, वास्को आणि मडगाव येथे एकूण ६ ठिकाणी साजरी करण्यात आली.
म्हापसा येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात उपस्थित जिज्ञासू.
महोत्सवाचा प्रारंभ व्यासपूजन आणि भक्तराज महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले गेले. ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ या विषयावर प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण करण्यात आले. रामराज्य स्थापनेसाठी संकल्प व सामूहिक नामजपयज्ञ करण्यात आला. हिंदुत्वासाठी कार्य करणार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महोत्सवाच्या ठिकाणी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन आणि फलक प्रदर्शन लावण्यात आले होते. देश-विदेशांतील हजारो भाविकांसाठी मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ आणि मल्याळम् भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला.