गोवा खबर : घर ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज आहे, आणि गरजू नागरिकांना हक्काचं निवारा मिळावा यासाठी ‘अटल आसरा योजना’ प्रभावी ठरत आहे, असे मत पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केले.
वाळपई नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित विशेष शिबिरात त्यांनी बोलताना सांगितले की, या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दर सहा महिन्यांनी शिबिरे घेण्याची गरज आहे. शिबिरात समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, प्रशासकीय अधिकारी व पंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.
अपूर्ण अर्ज, चुकीची कागदपत्रे यावर मार्गदर्शन करण्यात आले. घर दुरुस्तीसाठी रु. 1.5 लाखांपर्यंत अनुदान मिळवून देण्यासाठीही यंत्रणांना सूचना दिल्या गेल्या. डॉ. राणे म्हणाल्या, या योजनेमुळे फक्त आर्थिक मदत नव्हे तर गरजूंना सन्मानाने जगण्याचा आधार मिळतो.