गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धां’चे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमध्ये सातव्या ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धां’चे आभासी उद्घाटन केले. या स्पर्धांमध्ये 27पदक क्रीडा प्रकार आणि एक प्रात्यक्षिक खेळ समाविष्ट, 15 मे रोजी स्पर्धैचा समारोप होणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांसह बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार, केंद्रीय क्रीडा आणि  युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री  रक्षा खडसे आणि बिहार सरकार तसेच बिहार राज्य क्रीडा प्राधिकरणातील मान्यवर उपस्थित होते.

बिहारच्यावतीने आयोजित केलेली पहिली प्रमुख बहुविध क्रीडा स्पर्धा आहे. या 27 पदक क्रीडा प्रकारांचे आयोजन पाटणा, राजगीर, भागलपूर, गया, बेगूसराय आणि नवी दिल्ली या पाच शहरांमध्ये होत आहे. यंदाच्या `केआयवायजी`मध्ये प्रथमच सेपक्तक्रा  या आशियाई खेळाला पदक स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले आहे तर ई-स्पोर्ट्स हा प्रात्यक्षिक प्रकार म्हणून दाखवला जाईल. या वर्षीच्या स्पर्धांमध्ये 10000 हून अधिक सहभागी होत असून यात 6000 पेक्षा जास्त खेळाडू आहेत.

यावर्षी मार्चमध्ये भारताच्या पुरुष सेपक्तक्रा संघाने पाटणा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सेपक्तक्रा महासंघ (आयएसटीएएफ) विश्व चषकामध्ये इतिहासात पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले होते. या यशामुळे संपूर्ण देशात जल्लोश साजरा करण्यात आला आणि पंतप्रधानांनी स्वतः या विजयाबद्दल अभिनंदन केले होते.

डॉ. मांडविय म्हणाले, “इतिहास आम्हाला सांगतो की, नालंदा व विक्रमशीला ही ज्याप्रमाणे ज्ञानकेंद्रे होती, आता हीच भूमी नव्या क्रीडा विकास केंद्रांसाठी ओळखली जाईल. बिहारसाठी हा महत्त्वपूर्ण काळ असून एक अभिमानाचा क्षण आहे.”

“या स्पर्धा ही बिहारला भव्य कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करणारे राज्य म्हणून नवप्रतिमा देण्याची संधी आहेत. विकसित बिहार हेच विकसित भारताचे अंग आहे. आता बिहारमधील प्रत्येक क्रीडा प्रतिभेला मंच मिळेल,” असेही त्यांनी नमूद केले.

‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत बिहारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संपूर्ण देशभरातील 1048 केंद्रांपैकी 38 केंद्र बिहारमध्ये कार्यरत आहेत. या ठिकाणी माजी खेळाडू प्रशिक्षण देत आहेत. सध्या 939 खेळाडू (473 पुरुष, 466 महिला) येथे प्रशिक्षण घेत आहेत. याशिवाय देशभरात 34 ‘राज्य उत्कृष्टता केंद्रं’ सुरू करण्यात आली आहेत.

उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बिहारने आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत 12 पदके (त्यापैकी एक सुवर्ण) जिंकली आहेत.

डॉ. मांडविय म्हणाले, “बिहारमधील चांगले दिवस सुरू झाले आहेत. पंतप्रधानांचा विश्वास आहे की हीच योग्य वेळ आहे. हे यश रचनात्मक प्रशिक्षण, खेळाडू-केंद्रित दृष्टिकोन आणि स्थानिक पाठबळामुळे शक्य झाले आहे.”

त्यांनी ‘संडे आॅन सायकल’ उपक्रमाचा उल्लेख करत सांगितले की, तंदुरुस्तीबाबत जनजागृती ही जीवनशैलीशी संबंधित समस्यांपासून मुक्त राहण्यासाठी अत्यावश्यक आहे.

भविष्यात ‘खेलो इंडिया शालेय स्पर्धा’, दीव येथे ‘किनारपट्टीवरील खेळ’, दक्षिण भारतात ‘मूलनिवासी खेळ’ आणि छत्तीसगढमध्ये ‘आदिवासी खेळ’ असे उपक्रम आयोजित केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Trending

Exit mobile version