गोवा खबर : पर्वरी येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळावा हा पक्षाची तळागाळातील पोहोच मजबूत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या अतूट समर्पणाचा आणि वचनबद्धतेचा पुरावा होता.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप गोवा अध्यक्ष दामू नाईक, मंत्री रोहन खंवटे, भाजप उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कारबोटकर आणि इतर वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती, ज्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि पक्षाच्या निरंतर यशात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. भाजप कार्यकर्ता मेळाव्याची सुरुवात भाजप पर्वरी मंडळाचे अध्यक्ष विनित परब यांनी केलेल्या स्वागताने झाली. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
दामू नाईक यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीवर भर देताना सांगितले, आमच्याकडे सध्या १३,००० सदस्य आणि १३८ सक्रिय सदस्य आहेत. हे केवळ आमचे संघटन मजबूत असल्यामुळेच शक्य झाले आहे. आम्ही हे संघटन आणखी वाढवत राहू. सर्वप्रथम, मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी आज या पदावर सलग सहा वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. पक्षासाठी मोठे योगदान देणाऱ्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनुभव आमच्यासाठी अमूल्य आहेत. त्यांच्याकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आमची संघटना मजबूत झाली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांनी अशाचप्रकारे आमचे नेतृत्व करत रहावे.
या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ हा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा, यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे कौतुक केले. पायाभूत सुविधा, शिक्षण, औद्योगिक वाढ, कृषी आणि समाजकल्याण यासारख्या क्षेत्रांमध्ये गोव्याच्या विकासात त्यांच्या समर्पणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यावर त्यांनी भर दिला. दूरदर्शी प्रशासन आणि शाश्वत विकास उपक्रमांद्वारे गोव्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी, सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आले. त्यांनी पुनरुच्चार करताना म्हटले, की पक्षाची ताकद त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, त्यांची अथक सेवा आणि लोककेंद्रित दृष्टिकोनामुळे राज्याच्या परिवर्तनास हातभार लागला आहे.
या कार्यक्रमात बोलताना खंवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनात्मक प्रशासनावर प्रकाश टाकला, ज्याने गेल्या काही वर्षांत भारताच्या विकासाला चालना दिली आहे. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या तळागाळातील प्रयत्नांचे व कामाचे कौतुक केले आणि समुदायांना सशक्त करण्यासाठी तसेच गोव्यात पक्षाचे अस्तित्व मजबूत करण्यासाठी अशाचप्रकारे कार्य करत राहावे, असे आवाहन केले.
भाजप पर्वरीचे सरचिटणीस नारायण नाईक यांनी सर्वांप्रती आभार व्यक्त केल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनी पक्ष नेतृत्व, पक्षाचे कार्यकर्ते आणि उपस्थितांचे असलेले अतूट समर्पण तसेच पक्षाच्या दूरदृष्टीप्रती असलेल्या वचनबद्धतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या भाजप कार्यकर्ता मेळाव्याने त्यांच्या सेवा, शासन आणि राष्ट्र उभारणीच्या मोहिमेला बळ देऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्साही आणि एकत्रित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले. सर्वसमावेशक वाढ आणि प्रभावी प्रशासन सुनिश्चित करण्याच्या नव्या वचनबद्धतेसह, भाजप कार्यकर्त्यांनी लोकांशी संपर्क साधण्यासाठी आणि गोव्याची प्रगती अशीच पुढे नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्याचे वचन दिले.