गोवा खबर : नाट्य क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कलाकारांनी संघर्ष करण्यास तयार असायला हवं असं प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी पेडणे येथे आयोजित केलेल्या नटवर्य प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सवाच्या उदघाटनसमयी केले.
यावेळी पणशीकरांच्या कन्या ज्येष्ठ अभिनेत्री जान्हवी पणशीकर आणि तरंगिणी खोत, पेडण्याचे नगराध्यक्ष मनोज हरमलकर, सातेरी मंदिर जिर्णोध्दार समितीचे अध्यक्ष रामा सावळ देसाई, कलामंचाचे अध्यक्ष प्रविण कोटकर तसेच गोवा मराठी अकादमीच्या पेडणे प्रभागाचे अध्यक्ष चंद्रकांत सांगळे उपस्थित होते.
नटवर्य प्रभाकर पणशीकर कलामंच, गोवा मराठी अकादमी पेडणे प्रभाग आणि मुळभूमिका सातेरी मंदिर जिर्णोध्दार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा तीन दिवशीय महोत्सव श्री देवी भगवती मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
प्रत्येक नाटक हे त्या काळापूरतं मर्यादित नसतं. तर त्या काळापुढेही जाणारं असतं. पणशीकरांची सर्वच नाटके ही आजच्या काळातही तेवढीच महत्वाची आहेत. नवीन नाट्यलेखकांनी आपल्या नाटकांचे वाडमयीन मूल्य काय आहे, याचंही समीक्षण करावं. नाटकामध्ये साचलेपणा येता कामा नये आणि त्या दृष्टीने नाट्यसंस्थांनी नाटक प्रवाही राहण्यासाठी नवनवीन बदल आणावेत. शब्द हा नाटकाचा प्राण आहे. त्यासाठी गोमंतकीय नाट्य कलाकारांनी स्पष्ट शब्दोच्चार, भाषाशुध्दी आणि लखलखीत संवादफेक यावर भर देणे आवश्यक आहे असंही पुढे बोलताना अनिल सामंत म्हणाले.
नाटक हे कलाकार तयार करण्याची कार्यशाळा असते. रसिकांनी स्थानिक कलाकारांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हौशी रंगभूमीवरच्या नाटकांना आवर्जून उपस्थित राहणे आवश्यक आहे असे उदगार ज्येष्ठ अभिनेत्री जान्हवी पणशीकर यांनी काढले.
नगराध्यक्ष मनोज हरमलकर यांनी आपल्या मनोगतात महोत्सवाला शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रविण कोटकर, चंद्रकांत सांगळे, प्रशांत मांद्रेकर, निलेश नाईक, उमेश गाड, आशिष कांबळी आणि केशव पणशीकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. कार्यक्रमाची सुरवात स्वरगंधा, मांद्रेच्या कलाकारांनी प्रस्तुत केलेल्या नांदीने झाली.
संस्थेचे उपाध्यक्ष राजमोहन शेट्ये यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर सदस्य केशव पणशीकर यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू बोंद्रे यांनी तर सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सोमनाथ पार्सेकर यांनी केले. तदनंतर गंगाळदेव नाट्यमंडळ, बिद्रुबाग मांद्रे या संस्थेने प्र. के. अत्रे लिखित तो मी नव्हेच या अजरामर नाटकाचा प्रयोग सादर केला.
रासकाना स्थानिक कलाकाराचे कातुक करण्यासाठी, त्याचा उत्साह वाढविण्यासाठी हौशी रंगभूमीवरच्या नाटकांना आवर्जून उपस्थित राहणे आवश्यक आहे असे उदगार ज्येष्ठ अभिनेत्री जान्हवी पणशीकर यांनी काढले.