गोवा खबर : महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ होता. भारताला आपल्या वारशाचा अभिमान असून, आता भारत एका नव्या ऊर्जेने पुढे वाटचाल करत आहे. ही देशाचे नवे भवितव्य लिहिणाऱ्या परिवर्तनाच्या युगाची पहाट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
यंदाच्या महाकुंभ मेळ्यात प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भाविकांची संख्या म्हणजे केवळ एक विक्रम नसून, या संख्येने आपली संस्कृती आणि वारसा यापुढची अनेक शतके अधिक मजबूत आणि समृद्ध राहावा यासाठी भक्कम पाया रचला आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. हा एकतेचा महाकुंभ यशस्वीरित्या पार पडल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. याबद्दल त्यांनी नागरिकांची मेहनत, त्यांचे प्रयत्न आणि निर्धाराबद्दल त्यांचे आभार मानले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार एका ब्लॉगच्या माध्यमातून लिहून ते एक्स या समाज माध्यमावर सामायिक केले आहेत.
ते म्हणाले, महाकुंभ संपन्न झाला… एकतेचा महायज्ञ संपन्न झाला. प्रयागराज इथे एकतेच्या महाकुंभात तब्बल 45 दिवसांपर्यंत ज्या प्रकारे 140 कोटी देशवासियांची आस्था एकत्र, एकाच वेळी या एका पर्वाशी जोडली गेली, ते मंत्रमुग्ध करणारे आहे! महाकुंभाची सांगता झाल्यानंतर जे विचार मनात आले, त्यांना मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.
महाकुंभात ज्या मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला, तो केवळ एक विक्रम नाही, तर आपल्या संस्कृती आणि वारशाला सुदृढ आणि समृद्ध ठेवण्यासाठी अनेक शतकांकरता एक भक्कम पाया देखील रचला गेला आहे. प्रयागराजमधील महाकुंभ आज संपूर्ण जगभरातील व्यवस्थापन तज्ज्ञांच्या बरोबरीनेच नियोजन आणि धोरण तज्ञांसाठीही संशोधनाचा विषय बनला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.